पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०६ : दुसरी महाआपत्ती आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात (७४,००० ते ५२,००० वर्षांपूर्वी)

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
27 Jul 2013 - 2:44 am

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

...ऑगस्ट २०१२ मध्ये "बीच कोंबिंग लाइफस्टाइल" थियरीला एक हलकासा सुखद धक्का बसला. त्या महिन्यात शास्त्रज्ञांना लाओसच्या उत्तर भागातील एका चुनखडीच्या गुहेत आधुनिक मानवी कवटीचे तुकडे सापडले. त्यांचे वय ६३,००० ते ४६,००० वर्षांच्या मध्ये कोठेतरी असल्याचे ठरवले गेले. म्हणजे एकंदरीत हे दुसर्‍या सफरीतले प्रवासी अगदीच भित्रे नव्हते म्हणायचे ! कारण समुद्रकिनारा सोडून शेकडो किलोमीटर आत जात त्यांनी लाओस, चीन, व्हिएतनाम आणि थायलंडमधील डोंगर पालथे घातले होते असे दिसते !

आतापर्यंत १०,००० वर्षे मानवाची सफर कोणत्याही मोठ्या अपघाताशिवाय पुढे चालली होती. पण बराच काळ शांत राहिलेल्या नियतीचे जरा वेगळेच बेत चालले होते. ७४,००० वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरच्या गेल्या २० लाख वर्षांतला जगातील सर्वात जास्त सक्रिय असलेल्या तोबा ज्वालामुखीचा महाभयानक उद्रेक झाला. हा उद्रेक इतका मोठा होता की त्याच्यामुळे १०० X ३० किलोमीटर आकाराचे तोबा सरोवर तयार झाले...

या महाउद्रेकाने इतकी राख वातावरणात उधळली गेली की त्यामुळे आताचा सर्व भारत, पाकिस्तान आणि मध्यपूर्वेचा काही भाग १ ते ५ मीटर जाडीच्या राखेच्या थराने झाकले गेले. ही राख ग्रीनलँडमधील बर्फाच्या आणि भारतीय महासागराच्या समुद्रतळाच्या को‌अरमध्ये सापडते. या पुराव्याच्या साहाय्याने हा उद्रेक ७४,००० वर्षांपूर्वी झाला असे निदान करण्यात आले आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते ह्या ज्वालामुखीने वातावरणात उधळलेल्या राखेने पुढच्या काही काळात (काही शे अथवा हजार वर्षे) सूर्यकिरणांना अडवल्यामुळे आणि हवा दूषित केल्यामुळे जगभर महाभयानक जीवहानी झाली.

या ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राख आणि धुराचा मुख्य रोख उत्तरपूर्वेकडे होता आणि त्याच्या चपाट्यात मुख्यतः भारताचा भूभाग येऊन तेथील जीवन समूळ नष्ट (mass extinction) झाले आणि काही काळाने (म्हणजे काही शे अथवा हजार वर्षांनी) तेथे परत मानवी वस्ती झाली. ह्याचा जनुकशास्त्रीय पुरावा भारतातील M आणि R मायटोकाँड्रियल उत्परिवर्तनांत सापडतो तो असा:

१. मानव प्रथम भारतात आला आणि त्यानंतर पूर्व आशियात गेला हे आपण पाहिले आहेच. म्हणजे भारतातील मूळ उत्परिवर्तने पूर्व आशियातील उत्परिवर्तनांपेक्षा जुनी असायला पाहिजेत. पण खरी परिस्थिती याउलट आहे, भारतातील काही मूळ मायटोकाँड्रियल उत्परिवर्तने पूर्व आशियापेक्षा जास्त 'तरुण' आहेत. हे ज्वालमुखीच्या उद्रेकानंतर उलट दिशेने प्रवास झाल्यानेच शक्य आहे.

२. पूर्वेकडील R मायटोकाँड्रियल उत्परिवर्तन व पश्चिमेकडील M मायटोकाँड्रियल उत्परिवर्तन ही दोन्ही भारतात असणे आणि ती तोबाच्या उद्रेकानंतर भारतात येणे हे तोबाच्या कहराने भारतातील मानवी जीवन बराच काळ पूर्ण नष्ट झाले आणि नंतर दोन्ही बाजूचे लोक भारतात आले असल्यासच शक्य आहे.

३. दक्षिण भारतात ज्वालापूरम येथे तोबा ज्वालामुखीच्या राखेच्या वरच्या आणि खालच्या जमिनीच्या थरांत सापडलेली दगडी हत्यारे आणि त्यांची वये हे सिद्ध करतात की तोबाच्या उद्रेकापूर्वी आणि नंतर भारतात मानव संस्कृती होती. ही गोष्टही या सिद्धान्ताचे समर्थन करते.

४. जनुकशास्त्राने ठरवलेला कालखंड आणि इतर पुराव्यांनी ठरवलेले कालखंड एकमेकाशी जुळणेही या मताला बळकटी देते.

तोबाच्या महाउद्रेकाचा झालेला अजून एक परिणाम म्हणजे भारताच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील आशियाई मानवांत झालेला जनुकीय फरक आणि त्यामुळे त्यांच्या बाह्यरूपात पडलेला फार मोठा फरक... "दक्षिण आशियावर झालेल्या ज्वालामुखीच्या राखेने तेथील पूर्णपणे नष्ट झालेले जीवन व त्यामुळे फार मोठ्या कालखंडाकरिता विभाजित राहिलेले त्याच्या दोन बाजूचे मानवसमूह" याचा हा परिणाम आहे... जनुकशास्त्रात या genetic furrow असे म्हणतात.

या महाआपत्तीतून उरलेल्या आणि सावरलेल्या मानवांची वंशविच्छेदाला तोंड देत परत भटकंती सुरू झाली. ही वाटचाल मुख्यतः चार दिशांनी झाली...

१. एक जथा पुढे मार्गक्रमण करत चीनमध्ये पुढे जाऊ लागला.

२. दुसरा जथा थोडा दक्षिणपूर्वेस निघाला आणि पापुआ न्यू गिनीत साधारण ४०,००० वर्षांपूर्वी पोहोचला.

३. तिसरा जथा जरा जास्त धाडशी होता. तो होडक्यांचा वापर करून दक्षिणेकडील टिमोर बेटावर पोहोचला आणि तेथून पुढे त्याने उत्तर ऑस्ट्रेलियात Arnhem Land येथे पदार्पण केले. या चवथ्या जथ्यातील मानवांनी नेहमीची बीच कोंबिंग लाइफस्टाइल सोडून जरा धाडसी प्रवास केला. त्यांच्याबद्दल थोडी जास्त माहिती घेऊया.

या मानवांनी बोटीचा वापर केला या दाव्याला बळकटी देणारे हे उत्तर ऑस्ट्रेलियात सापडलेले जगातील सर्वात जुने होडीचे चित्र...
येथे पहा.

प्रथम यांच्या ऑस्ट्रेलियन पदार्पणाचा काल ४०,००० वर्षांपूर्वीचा असावा असा समज होता. पण radiocarbon dating पेक्षा जास्त सुधारीत luminescence dating of silica हे तंत्र प्रगत झाल्यावर हा काळ ६०,००० ते ५०,००० वर्षापूवीच्या कालखंडातील असावा असे ठरविले गेले आहे. या काळात समुद्राच्या पाण्याची पातळी सद्याच्या पातळीपेक्षा ८० मीटर खाली होती, याचीही या मानवांना मदत झाली. त्या काळानंतर ही पातळी भरभर वाढू लागली, इतरांना ऑस्ट्रेलियात जाणे कठीण झाले आणि नंतरची काही दशसहस्त्र वर्षे त्या खंडाचा आणि तेथील मानवांचा इतर जगाशी संबंध तुटला ही तथ्येही जुन्या कालखंडाच्या बाजूनं आहेत.

मात्र जनुकशास्त्राचे पुरावे अजून पुढे जाऊन असे दर्शवितात की ऑस्ट्रेलियात मानवाचा शिरकाव ६८,००० वर्षांपूर्वींइतका जुना असावा. त्या काळात समुद्राच्या पाण्याची पातळी गेल्या एक लाख वर्षांतली सर्वात कमी होती, हे तथ्यही या काळाच्या अंदाजाला बळकटी देते. मात्र याला आधार देणारे जीवावशेष मिळेपर्यंत तो एक सिद्धांतच राहील. असो.

या मानवांनी त्यानंतर हळू हळू त्या काळी सुपीक, जंगलांनी भरलेले आणि प्राणिजीवनाने समृद्ध असलेले ऑस्ट्रेलिया पादाक्रांत करून ५०,००० वर्षांपूर्वीपर्यंत त्याचा दक्षिण किनारा गाठला.

४. तोबाच्या कहरातून सावरलेले मलाय व्दिपकल्पातील काहीजण उलट फिरून ब्रह्मदेशाच्या दक्षिण किनार्‍यावरून परत भारतात शिरले. ते त्यांच्या पूर्वजांच्या मार्गानेच पण या वेळेस विरुद्ध दिशेने प्रथम भारताच्या पूर्व किनार्‍याने आणि नंतर पश्चिम किनार्‍याने सिंधू नदीच्या खोर्‍यापर्यंत आले. तेथे त्यांची आफ्रिकेतून बाहेर पडणार्‍या पुढच्या टोळ्यांशी गाठ पडत राहिली असणारच. मात्र या सगळ्यांना पुढची १०,००० वर्षे हिमयुगाच्या प्रभावाने तयार झालेल्या मध्य आशियातील वाळवंटाने आणि थंडीने रोखून धरले. ५०,००० वर्षांपूर्वी हवामानात बदल होऊन अरेबियन वाळवंट आणि 'सुपीक चंद्रकोरी' चे पाणथळ हिरव्या भूमीत परिवर्तन झाले तेव्हाच त्यांना उत्तरपश्चिमेकडे पुढची वाटचाल करणे शक्य झाले.

हवामानाच्या बदलांचे दाखलेही यालाच अनुमोदन देतात. गेल्या एक लाख वर्षांमध्ये लेव्हांत किंवा "सुपीक चंद्रकोर" काही छोटे सुधारलेल्या हवामानाचे काळ (interstadials) सोडले तर कडकडीत थंड वाळवंट होते. या वाळवंटाने मानवाची युरोपमध्ये जाण्याची वाट रोखून धरली होती. मात्र ६५,००० वर्षांनंतरच्या कालखंडात चार वेळा हवामानात काही काळ फरक पडून हा भाग काहीसा गरम आणि पाणथळ झाला होता. यातला शेवटचा सर्वात जास्त गरम व मोठा (५,००० वर्षे) असलेला कालखंड ५१,००० वर्षांपूर्वी सुरू झाला. हा काल इतका गरम होता की त्यामुळे दक्षिण आशियातही जास्त पर्जन्यवृष्टी होऊन झालेल्या अन्नाच्या मुबलकतेमुळे तेथील लोकसंखेतही परिणामकारक वाढ झाली. या सगळ्याचा परिणाम दक्षिण आशियातून टर्की व बल्गेरिया मार्गे दक्षिण युरोपाकडे मानवी स्थलांतर होण्यात झाला.

दुसरा शक्य असणारा मार्ग म्हणजे सिंधूच्या खोर्‍यातून काश्मीरमार्गे मध्य आशिया. येथे ४०,००० वर्षांपूर्वी मॅमथची (प्राचीन अजस्त्र आणि केसाळ हत्तीसदृश प्राणी) शिकार करण्याइतपत कौशल्य असलेले मानव होते. ते पुढे उरल पर्वतांतून पश्चिमेकडे आताच्या रशिया, झेक रिपब्लिक मार्गे जर्मनीत गेले असावेत.

या पाचीन प्रवासात सहाजीकच माणूस आपली भाषा बरोबर नेत राहिला. अर्थात तिच्यात काल आणि स्थलमानाप्रमाणे बदल होत गेले. पण आजही मानवाच्या भारत ते युरोप या मार्गांवरील ४३९ आधुनिक भाषांचा इतका जवळचा संबंध आहे की त्यांचे भाषाशास्त्रात "इंडो-युरोपियन" या सुपरफॅमिलीत वर्गिकरण केलेले आहे. यातल्या २११ भाषांचे वर्गिकरण "इंडो-आर्यन" असे आहे.

इंडो-युरोपियन भाषांची यादी येथे मिळेल. आजच्या घडीला जगातील निम्मे म्हणजे अंदाजे ३०० कोटी लोक इंडो-युरोपियन भाषा बोलतात. जगातल्या जास्तीत जास्त भाषिक असणार्‍या २० पैकी १२ भाषा इंडो-युरोपियन आहेत, त्या अशा: स्पॅनिश, इंग्लिश, हिंदी, पोर्तुगीज, बंगाली, रशियन, जर्मन, मराठी, फ्रेंच, इटालिअयन, पंजाबी आणि उर्दू.

इंडो-युरोपियन भाषांची स्थाने दाखवणारा नकाशा (जालावरून साभार)...

सद्याच्या युरोपातील लोकांमध्ये असलेले जनुकीय पुरावेही त्यांचे पूर्वज ५०,००० वर्षांपूर्वी दक्षिण आशियातून आले असे दाखवतात असे सिद्ध झाल्यावर तर "युरोपमध्ये वेगळ्या मानवी संस्कृतीची स्वतंत्र सुरुवात होऊन ती वेगाने प्रगत झाली आणि मग त्यांनी ती प्रगती इतर ठिकाणी पसरवली" ही कल्पना पूर्णपणे खोटी ठरली. अजून एका कपोलकल्पित स्वप्नावर आधारलेल्या सिद्धान्ताला (थियरीला) जनुकशास्त्राने सुरुंग लावला आणि अगोदर आशियात झालेल्या सगळ्या मानवी सुधारणांचा फायदा युरोपात उशीरा घुसणार्‍या मानवांना झाला हे तथ्य सर्वमान्य झाले !

(क्रमशः )

=====================================================================

महत्त्वाचे दुवे

१. https://en.wikipedia.org/wiki/Homo_sapiens
२. https://genographic.nationalgeographic.com/
३. http://www.smithsonianmag.com/
४. http://en.wikipedia.org/wiki/Human_migration
५. http://www.bradshawfoundation.com/

=====================================================================

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११(समाप्त)...

=====================================================================

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

27 Jul 2013 - 3:02 am | राजेश घासकडवी

इतर भागांप्रमाणेच छान. भारतात अधिक 'तरुण' म्यूटेशन्स सापडतात, तर मग जुनी का सापडत नाहीत? हा प्रवास भारतमार्गेच झाला असं पहिल्या चित्रातून दिसलं...

दुसरं मला नेहमीच कुतुहल वाटत राहिलेलं आहे... या काळात मानवाची लोकसंख्या किती होती, कशी बदलत गेली याचे काही अंदाज आहेत का? एके काळी दहा हजार पर्यंत कमी झाली होती असा उल्लेख आला होता. तसंच या उत्पातातही प्रचंड जीवितहानी झाली असावी. याबाबतीत काही प्रकाश पाडता येईल का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2013 - 3:35 am | डॉ सुहास म्हात्रे

तोबाच्या उद्रेकाने सर्व दक्षिण आशिया १ ते ५ मीटर जाडीच्या राखेने झाकून गेला होता. शिवाय वातावरण दुषित झाले होते. त्यामुळे त्या काळात तेथील सर्व जीवन (यात वनस्पतीही आल्या) काही शे ते हजार वर्षेपर्यंत नष्ट झाले होते. त्यामुळेच भारताच्या पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे (मंगोलियन वंशाचे) लोक यांच्या इतका मोठा फरक निर्माण झाला.

पूर्वेकडून परत फिरलेल्या लोकांबरोबर त्यांची जुनी मुटेशन्स परत आलीच पण वंश पुढे जाताना नवीन निर्माण होणारी (तरूण) म्युटेशन्स पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडे (ब्रम्हदेश --> पूर्व भारत --> पश्चिम भारत) उलट्या दिशेने आली. येथे तरूण हा शब्द म्युटेशन्सच्या आस्तित्वात येण्याच्या काळासंदर्भात वापरलेला आहे.

सुरुवातीच्या काळात आफ्रिकेतल्या मानवांची संख्या १०,००० होती, हा जनुकीय सिद्धांताने काढलेला निष्कर्ष आहे. मानव इतरत्र पसरू लागल्यावर अंदाज बांधणे कठीण तर आहेच पण तो अल्गोरिदम प्रचंड गुंतागुंतीचा होतो आणि त्याचे निष्कर्ष तितकेसे विश्वासू राहत नाहीत. बहुतेक यामुळेच पुढच्या प्राचीन लोकसंख्यांचे खात्रीचे अंदाज असलेले दुवे माझ्यातरी वाचनात आलेले नाहीत.

चाणक्य's picture

27 Jul 2013 - 7:42 am | चाणक्य

भाग. उत्कंठावर्धक झालाय. पु.भा.शु.

मन१'s picture

27 Jul 2013 - 7:52 am | मन१

वाचत आहे.

प्रचेतस's picture

27 Jul 2013 - 9:19 am | प्रचेतस

जबरदस्त प्रवास चालू आहे.
सोबतीला नकाशे दिल्याने प्रवास समजून घेण्यास मदत होत आहे.

येथे ४०,००० वर्षांपूर्वी मॅमथची शिकार करण्याइतपत कौशल्य असलेले मानव होते

ह्याचे पुरावे नेमक्या कशा प्रकारचे आहेत?

मन१'s picture

27 Jul 2013 - 12:26 pm | मन१

एखादा मॅमथचा सांगाडा सापडला असावा. त्या सांगाड्यावरून त्याची शिकार झाल्याचा निष्कर्ष निघाला असेल.
उदा:- जबडा किंवा डोळेव इथे विशेष आकाराच्या हत्यारांनी जखम केल्याची निशाणी वगैरे. थोडक्यात अशा जखमांचे अस्तित्व सिद्ध झाले असेल की ज्या निसर्गतः होणे शक्य नाही, कुणीतरी नेम धरुन त्या केल्या असाव्यात.
अर्थात हा माझ अंदाज.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2013 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे पुरावे तेथे सापडलेल्या मॅमथच्या हाडांच्या आणि आधुनीक मानवी हत्यारांच्या स्वरूपात आहेत.

अश्या मोठ्या आणि उंच प्राण्याची सुरक्षित शिकार करण्यासाठी भाल्यासारखे तीक्ष्ण आणि फेकून मारता येणारे हत्यार असणे जरूर होते. त्याचप्रमाणे अशी कठीण आणि धोकादायक शिकार करण्यासाठी मानवांच्या मोठ्या समुहाने एकत्र येऊन सुसंबद्धपणे आराखडा करून मग ठरवल्यानुसारच प्रत्येकाने आपली कृती करणे अत्यंत जरूरीचे होते. या सगळ्या गोष्टींचा मानवाची सामाजीक आणि बौद्धीक सुधारणा होण्यात फार मोठी मदत झाली असणार. किंवा अशा प्रकारची सुधारणा मानवात झाल्याने तो ही शिकार जास्त सुरक्षितपणे करू शकला असेल. दोन्हीपैकी कोणतीही गोष्ट पहिली झाली असली तरी या दोन गोष्टीचा एकमेकावर परिणाम पूरक होता. यामुळे हा काळ मानवाच्या प्रगतीत महत्वाचा समजला जातो.

अवांतरः

१. मॅमथची शिकार करणारा आधुनिक मानव पहिला शिकारी नव्हता. कारण नियांडरथाल आणि होमो इरेक्टसही ही शिकार त्याच्या अगोदर काही लाख वर्षांपासून करत होते. नियांडरथालच्या युरोपात मिळालेल्या अवशेषांवरून असे दिसते की त्यांची हत्यारे तुलनेने बोथट आणि बरीचशी ओबडधोबड होती त्यामुळे त्यांना प्राण्यांच्या खूप जवळ जाऊन हल्ला करणे भाग पडत असणार. याची परीणती जखमा आणि जीवीतहानीत होत असणार. नियांडरथालच्या सापडलेल्या हाडांवर असलेल्या जखमांच्या खाणाखूणा या सिद्धांतास पाठींबा देतात.

२. युक्रेनमध्ये नियांडरथालने मॅमथची हाडे (कवट्या, जबडे, सुळे आणि पायाची हाडे) वापरून बनवलेले एक मोठे "घर" सापडले आहे. त्यांत उष्णतेसाठी २५ शेगड्याही होत्या ! यावरून असे दिसते की नियांडरथालमध्येही सामाजीक जीवनपद्धती विकसित झालेली होती.

प्रचेतस's picture

27 Jul 2013 - 12:58 pm | प्रचेतस

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मॅमथची शिकार खाण्यासाठी होत असावी का प्रतिष्ठेसाठी? कारण तुलनेने बरेचसे सोपे असलेले तृणभक्षी प्राणी असतीलच.
तुम्ही म्हणताय तसे मॅमथच्या हाडांचा बांधकामासाठी/ वस्तु बनवण्यासाठीही उपयोग होत असेलच.

१०००० बीसी मधला हा मॅमथच्या शिकारीचा एक व्हिडियो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2013 - 1:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

मॅमथची शिकार मुख्यतः अन्नासाठीच होत होती. विकसित होणार्‍या सामाजिक व्यवस्थेने एकत्र राहणार्‍या पण अजून दीर्घ काळ अन्नाची साठवण करण्याची समज न आलेल्या मानवी समुदायाला एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात अन्नपुरवठा करण्याचे साधन असेच मॅमथचे स्थान त्यावेळेस मानवी जीवनात होते असे म्हटल्यास खोटे ठरणार नाही.

मानवांनी केलेला शिकारीचा अतिरेक हे युरोप, अशिया आणि ऑस्ट्रेलियातले मॅमथ नष्ट होण्याचे एक फार महत्वाचे कारण आहे असा एक सिद्धांत आहे. प्राणीमित्रांचा विरोध असतानाही गेल्या एकाच शतकात माणसाच्या शिकारीने नष्ट झालेल्या किंवा नष्ट होऊ घातलेल्या प्राण्यांची यादी पाहिली तर हा सिद्धांत फार चूक असेल असे वाटत नाही. :)

प्रचेतस's picture

27 Jul 2013 - 1:49 pm | प्रचेतस

अगदी खरंय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Aug 2013 - 9:26 am | ज्ञानोबाचे पैजार

हे मॅमथ म्हणजे हत्तीचे पुर्वज दिसतायत. हे जर खरच हत्तीचे पुर्वज असतील तर असे म्हणता येईल की मानवात जशी उत्क्रांती झाली तशी प्राण्यांमधेही होत असणार. उदा अफ्रिकन हत्ती आणि भारतिय हत्तीत जाणवण्या इतका फरक असतो. म्हणजे मानवा प्रमाणे इतर प्राणी देखील रहाण्या साठी / जगण्यासाठी नवनवीन जागा शोधत फिरत होते / असतात असे म्हणता येईल का? मानव मंगळावर वस्ती करता येईल का याची चाचपणी करत आहे तो पण याच प्रेरणेमुळे का?( हे दोन्ही या लेखमालेचे विषय नाहीत पण फक्त कुतुहल वाटले म्हणुन विचारले.)

दुसरी शंका म्हणजे हा सगळा प्रवास अफ्रीका अशिया युरोप आणि ऑस्ट्रेलिया असा दिसतो. पण कोलंबस जेव्हा अमेरीकेत गेला तेव्हा त्याचे स्वागत रेड इंडियन माणसांनीच केले. ते तिकडे कधी आणि केव्हा पोचले?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2013 - 12:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे मॅमथ म्हणजे हत्तीचे पुर्वज दिसतायत.... अफ्रिकन हत्ती आणि भारतिय हत्तीत जाणवण्या इतका फरक असतो. ..
मॅमथ हत्तींचे पूर्वज नाहीत तर मॅमथ व हत्तींचे पूर्वज एकाच प्राण्यापासून साधारण ५० लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाले (जसे मानव व ग्रेट एप्स एकाच प्राण्यापासून उत्क्रांत झाले तसे) आणि अगदी ४,५०० वर्षांपूर्वी मॅमथ नष्ट होइपर्यंत ते दोघे बरोबरीने रहात होते. मात्र त्यांच्या जीनोममध्ये खूप फरक पडला असल्याने त्यांच्यात संकर शक्य नव्हता.

आफ्रिकन (Loxodonta ) आणि भारतिय (Elephas) हत्ती हे एकाच प्राणी फॅमिलीतले आहेत. त्यांच्यामधले दिसणारे बाह्य फरक हे त्या जमाती एकमेकापासून दशहजारो / लाखो वर्षे दूर राहिलेल्यामुळे झालेल्या स्वतंत्र उत्परिवर्तनाचा परिणाम आहेत.

मानवा प्रमाणे इतर प्राणी देखील रहाण्या साठी / जगण्यासाठी नवनवीन जागा शोधत फिरत होते / असतात असे म्हणता येईल का?
सुरक्षितपणे जिवंत राहणे आणि वंशवृद्धी करणे ह्या सर्वच प्राण्यांच्या मूलभूत प्रवृत्ती आहेत. त्याकरिता (१) 'राहण्यासाठी पूरक व सुरक्षित परिस्थिती (यात हवामान आलेच)' आणि (२) 'जगण्यासाठी योग्य व पुरेसे अन्न' ही दोन कारणे सर्वकाल सर्वच प्राण्यांच्या (यात मानवप्राणीही अंतर्भूत आहे) स्थलांतरासाठी कारण ठरत आलेल्या आहेत... गम्मत म्हणजे, नीट विचार केला तर असे दिसेल की, आजही हीच मूळ दोन कारणे तशीच्यातशीच कायम आहेत !!!

मानव मंगळावर वस्ती करता येईल का याची चाचपणी करत आहे तो पण याच प्रेरणेमुळे का?
वरच्या प्रश्नाच्या उत्तरातच या प्रश्नाचे उत्तरही आहे.

पण कोलंबस जेव्हा अमेरीकेत गेला तेव्हा त्याचे स्वागत रेड इंडियन माणसांनीच केले. ते तिकडे कधी आणि केव्हा पोचले?
याचे सविस्तर उत्तर जेव्हा सफर पुढे जात अमेरिका खंडात जाईल तेव्हा येईलच.

स्पा's picture

27 Jul 2013 - 9:31 am | स्पा

लय भारी

या भागात भारत पिक्चर मध्ये आलेला पाहून अजूनच मजा आली :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2013 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

शेखर काळे's picture

27 Jul 2013 - 11:09 am | शेखर काळे

सर्वप्रथम एक्कासाहेबांचे अभिनंदन.
सोप्या भाषेत हा विषय आपण फार रोचक केलेला आहे.

ज्वालापुरम बद्दल काही माहिती वाचली असता, असे दिसले की काही तज्ज्ञांना वाटते की भारतीय उपखंडात मानवी साखळी खंडित झाली नसून उलट काही प्रमाणात मानवांनी तिथे वस्ती केली होती.
शिवाय, भारतीय उपखंडात म्हणा किंवा दक्षिण आशियात आणखी काही जागी ज्वालापुरम सारखेच काही अवशेष आढळले आहेत का ?
पुढच्या लेखांकासाठी शुभेच्छा ..

- शेखर काळे

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2013 - 1:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

अफ्रिकेतून बाहेर पडून दक्षिण भारताच्या मार्गे मानव पूर्वेस गेला आणि जाताना बनलेली ही साखळी तोबा ज्वालामुखीच्या उद्रेकाने कशी खंडीत झाली आणि मग दोन्हीबाजूचे मानव परत येऊन ती साखळी परत कशी जोडली गेली हे त्याच्या पुराव्यांसह लेखात लिहिले आहे.

तोबाच्या राखेच्या थराच्या वरच्या आणि खालच्या जमिनीत सापडलेले पुरावे हे मुख्यतः दगडी हत्यारांच्या स्वरूपात आहेत. मानवी अवशेष अजून तरी सापडलेले नाहीत. त्यामुळे आज तरी जनुकशास्त्राचे पुरावे याबाबतीत सर्वात महत्वाचे आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2013 - 1:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

चाणक्य आणि मन१ : आपल्या सहलितील सहभागासाठी धन्यवाद !

कवितानागेश's picture

28 Jul 2013 - 12:08 am | कवितानागेश

मस्त आहे हा भाग पण.
एक कुतुहल वातलं.. ज्वालामुखीला हे 'तोबा' नाव कुणी आणि कधी दिलय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2013 - 10:31 am | डॉ सुहास म्हात्रे

तोबा हे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरच्या पर्वताचे नाव आहे. त्याचा "तोबा तोबा" या वाक्प्रचाराशी काय संबद्ध आहे की नाही हे मला माहिती नाही ;) मात्र हजारो वेळा तोबा तोबा म्हणण्याएवढी ताकद तोबा पर्वतातील ज्वालामुखीच्या उद्रेकात नक्की होती. कारण त्याने २८०० घन किलोमीटर (७ X १०** १५ किलोग्रॅम) दगडमाती आकाशात उधळली होती आणि त्यामुळे सुर्यकिरण अडल्याने पृथ्वीचे तापमान खाली येऊन पुढची १००० वर्षे हिमयुगाचा अतिथंड (glacial period) काळ सुरू झाला होता.

कवितानागेश's picture

29 Jul 2013 - 7:16 am | कवितानागेश

मला "तोबा तोबा" च आठवलं. नक्की अर्थ माहित नाहीये, पण कशाचाही 'उद्रेक' झाला की 'तोबा तोबा' ओरडणं हे भाषेत तेंव्हापासूनच आलय की काय अशी शन्का आली. :)

सुकामेवा's picture

29 Jul 2013 - 12:17 pm | सुकामेवा

वा अप्रतिम माहिती व तितकीच रोचक सुद्धा.
पु.भा.प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Aug 2013 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

एक्कासाहेबांचा दांडगा व्यासंग वाक्यावक्याला जाणावतो.

काहि प्रश्न.

डायनासोर्सच्या विनाशाला तोबा सारखीच घटना कारणीभूत आहे असं कुठेतरी वाचलं होतं... त्या घटनेचे रिपल इफेक्ट तोबाच्या वेळी जाणवण्याइतपत होते कि कसे? त्याचा वेगळा परिणाम मानव वंशावळीवर दिसुन येतो काय?

तोबाचा परिणाम म्हणुन मानवी चेहेरे पूर्व-पश्चिम असे बदलले गेले कि काहि कारणाने काहि विशिष्ट मानव समुह तोबोत्तर काळात टिकुन राहिला व त्याचाच चेहेरा पूर्व दिशेला मिळाला?

तोबाच्या राखेने समुद्री जीवांमधे देखील काहि दृष्य परिणाम घडवुन आणले काय? ते परिणाम मानवावर झालेल्या परिणामांशी जुळतात काय?

अर्धवटराव

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Aug 2013 - 11:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

डायनासोर्सच्या विनाशाला तोबा सारखीच घटना कारणीभूत आहे असं कुठेतरी वाचलं होतं... त्या घटनेचे रिपल इफेक्ट तोबाच्या वेळी जाणवण्याइतपत होते कि कसे? त्याचा वेगळा परिणाम मानव वंशावळीवर दिसुन येतो काय?

अंदाजे ६.५ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या एका विनाशात पृथ्वीवरील जीवनापैकी 17% families, 50% genera आणि 75% species नष्ट झाल्या. त्यांतच डायनॉसॉर्स नष्ट झाले. या विनाशाचे नक्की कारण अजून माहित नाही... पण जी अनेक कारणे सांगीतली जातात त्यातली खालची महत्वाची आहेतः

१. साधारण ५-१५ किलोमीटर व्यासाची उल्का पृथ्वीवर (मेक्सिकोच्या युकातान व्दिपकल्पावर) आदळून उधळलेल्या धुळीने सुर्यकिरणांना अडवून हिमयुग निर्माण केले. कडाक्याच्या थंडीच्या परिणामाव्यतिरिक्त हवामानाच्या फरकाचा अजून एक परिणाम म्हणजे वनस्पती (जंगले) प्रचंड प्रमाणात नष्ट झाल्या... अर्थातच शाकाहारी डायनॉसॉर्सची उपासमार झाली.

२. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरच्या डोंगरावरच्या ज्वालामुखींचे उद्रेक... हा उद्रेक तोबासारखाच पण अनेक पटींनी जास्त तिव्रतेचा आणि एक/काही हजार वर्षे चालू असलेला होता.

वरचा काळ ६.५ कोटी वर्षांपूर्वीचा असल्याने त्याचा तोबाच्या उद्रेकाशी (७४,००० वर्षांपूर्वीचा काळ) संबद्ध असणे शक्य नाही.

तोबाचा परिणाम म्हणुन मानवी चेहेरे पूर्व-पश्चिम असे बदलले गेले कि काहि कारणाने काहि विशिष्ट मानव समुह तोबोत्तर काळात टिकुन राहिला व त्याचाच चेहेरा पूर्व दिशेला मिळाला?

तोबाच्या उद्रेकामुळे दक्षिण आशियातील जीवन नष्ट झाले आणि तेथे अनेक शे/हजार वर्षे जीवन नांदू शकले नाही. मात्र त्यामुळे संपूर्णपणे विभागलेले भारताच्या दोन बाजूचे मानव समुह मोठ्या कालखंडाकरिता वेगळे राहिले. ते एकमेकात मिसळू शकले नाहीत, त्यांच्यातील उत्परिवर्तने संपूर्णपणे स्वतंत्रपणे होत राहिली आणि त्याचा परिणाम म्हणून या दोन मानवसमुहांचे सद्याचे बाह्यस्वरूप इतके वेगळे दिसते.

तोबाच्या राखेने समुद्री जीवांमधे देखील काहि दृष्य परिणाम घडवुन आणले काय? ते परिणाम मानवावर झालेल्या परिणामांशी जुळतात काय?

तोबाच्या उद्रेकाने जमिनीवरच्याप्रमाणेच पाण्यातले असंख्य जीव नष्ट झाले. पण वर सांगीतल्याप्रमाणे जशी जमिनीवरच्या प्राण्यांची (आणि मानवांची) खूप कालावधीसाठी पूर्ण विभागणी झाली तशी पाण्यामध्ये शक्य नव्हती. अर्थातच भारताच्या पुर्वेकडील आणि पश्चिमेकडील जलचर अशी विभागणी अपेक्षित नाही.

दादा कोंडके's picture

3 Aug 2013 - 12:22 pm | दादा कोंडके

सोप्या भाषेतली माहिती आवडली.

या प्रवासात पुर्वी बदल होण्यास हजारो वर्षे लागली आणि आता हा कालावधी काही शतकं आणि दशकांवर येउन ठेपलाय. त्यामुळे मानवानं केलेली प्रगती इतर नैसर्गिक गोष्टींसारखी एक्स्पोनंशिअल आहे असं वाटत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2013 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

माणसाच्या मेंदूची करामत सुरू करणारी उत्परिवर्तने झाली तशी माणूस वेगवेगळी साधने बनवायला लागला आणि त्यांचे उपयोग / दुरुपयोग (ही पण मेंदूचीच करामत) करून समाजकारण/धर्मकारण/राजकारण/अर्थकारण, इ. करू लागला... जशी मानवाची भौतिक आणि बौधिक साधने बनवण्याचे "कौशल्य" वाढत गेले तशी त्याची "प्रगती" आकाश भेदून भौतिक/आध्यात्मिक अंतराळातही पोहोचली.

अप्रतिम चाललिय मालिका!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2013 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

पैसा's picture

6 Aug 2013 - 11:02 pm | पैसा

हा भाग मुद्दाम उशीरा वाचला! लेखासोबतच प्रतिक्रियांमधून उत्तम माहिती मिळते आहे! मनापासून धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2013 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

लै उशीर झाला हा भाग वाचायला, पण लै जबरी मजा आली. भारतात कशी लोकवस्ती झाली, हे त्या निमित्ताने नव्याने समजले. तोबा ज्वालामुखीबद्दल नेमके असे पहिल्यांदाच वाचले, बहु धन्यवाद एक्कासाहेब.

इंडो-युरोपियन भाषा हा मात्र लै नंतरचा प्रकार आहे. १० हजार वर्षांपलीकडे ते असणे शक्य नाही असे म्हणतात. तो एक अर्थात पूर्णच वेगळा प्रकार आहे म्हणा. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2013 - 1:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

इंडो-युरोपियन भाषा हा मात्र लै नंतरचा प्रकार आहे. १० हजार वर्षांपलीकडे ते असणे शक्य नाही असे म्हणतात. तो एक अर्थात पूर्णच वेगळा प्रकार आहे म्हणा. असो.

मला वाटते तुमची "भाषांची वये" आणि "लिखीत भाषांच्या सापडलेल्या पुराव्यांची वये" या दोन फार वेगळ्या गोष्टीत गल्लत होतेय.

Australopithecine आदिमानवांत ग्रेट एप्सपेक्षा फार वेगळी संवादक्षमता नव्हती याबाबत शात्रज्ञांचे एकमत आहे. मानवात आदिभाषेचा (proto-language) वापर केव्हा सुरू झाला याबाबत अजून शात्रज्ञांचे एकमत नाही... काहिंच्या मते Homo habilis ने २३ लाख वर्षांपूर्वी, काहींच्या मते Homo erectus ने १८ लाख वर्षांपूर्वी, तर इतर काहिंच्या मते Homo heidelbergensis ने ६ लाख वर्षांपूर्वी तीचा वापर सुरू केला. मात्र शारिरीक दृष्ट्या पूर्ण उत्क्रांत झालेल्या Homo sapiens मध्ये १ लाख वर्षांपूर्वींनंतर लवकरच कधितरी आपल्याला आता मान्य असलेले गुणधर्म असलेल्या भाषा उत्क्रांत होऊ लागल्या याबाबत बहुतेक सर्वांचे एकमत आहे. हा काळ मानवाच्या आफ्रिकेतूबाबाहेर पडून अशियात येण्याच्या अगोदरचा आहे.

माणसे जसजशी जास्त जास्त दूरची वाटचाल करू लागली आणि त्यांच्यातले भौगोलीक अंतर वाढू लागले तसे रोजच्या वापरातील फरकाने भाषांत फरक होत गेले. मात्र मूळ भाषेचे काही विशेष तसेच पुढे जात राहिले आणि त्यांत अजून नविन भर पडत राहिली... ज्यांचा उपयोग करून भाषांचे वर्गीकरण केले जाते. हा भाषेच्या उत्क्रांतीच्या आणि जनुकीय उत्परिवर्तनांच्या उत्क्रांतीचा पाया एकाच प्रकारचा आहे... म्हणजे जुने बरोबर घेउन वाटचाल आणि त्यांत नविन भर ! (अर्थात यांत जनुकीय उत्क्रांतीचा भाषेच्या उत्क्रांतीशी परस्पर संबध लावलेला नाही, फक्त या दोन उत्क्रांतींतिल साम्यस्थळ नोंदवले आहे.)

सर्व भाषा प्रथम मुख्यतः खाणाखूणा आणि काही प्रमाणात ध्वनीचा वापर करून उत्क्रांत होत गेल्या. यात त्याकाळची गरज हे एक मोठे कारण होते. उदा. आफ्रिकेतल्या बहुतेक सगळ्या भाषांत चक् चक् असे काहिसे आवाज आहेत. प्राण्यांनी मानवी आवाज ऐकून बुजून जाऊन पळून जावू नये म्हणून त्यांची शिकार करताना असे जंगलात सामान्य वाटणारे आवाज वापरून एकमेकाशी संपर्क साधण्यासाठी या खुणांचा अगदी सुरूवातीपासून उपयोग केला जात असावा. आणि आता ते आवाज आफ्रिकाभरच्या बर्‍याच भाषांत फारसा बदल न होता तसेच वापरले जातात... आज अन्नासाठी शिकार आवश्यक नसली तरी!

सुरुवातीला सर्व भाषा बोलीभाषाच होत्या आणि त्यांची वाटचाल मानवाच्या वाटचालीबरोबर "स्मृती-श्रुती" अशीच झाली. याच कारणाने सर्व खूप जुने साहित्य काव्यमय आहे... लयबद्ध रचनेमुळे माहिती, लक्षात ठेवायला सोपी आणि सहज बदल न होता मूळ रुपात पिढ्या न पिढ्या पुढे नेणे शक्य झाले. अर्थात काव्यात्मकतेने आणि गायनाने माहिती मनोरंजक होऊन तिच्याबद्दल आकर्षण कायम ठेऊन ती पुढे नेणे शक्य झाले, हा एक अजून फायदा होताच.

पुढची पायरी म्हणजे मानव चिन्हे वापरून भाषा "लिहू" लागला... झाडाच्या पानावर, लाकडावर, ओल्या मातीच्या पाट्यांवर, नाण्यांवर, दगडांवर, वगैरे, वगैरे. यातले बहुतेक सर्व प्राचीन पुरावे त्यांच्या नश्वरतेमुळे काळाबरोबर नष्ट झाले... त्यानंतरच्या काळातले काही (विषेशतः दगड व धातूंवरचे) शिल्लक राहिले... त्यातले काही आतापर्यंत सापडले आहेत. अर्थात जे सापडले आहेत त्यांचे महत्व वादातीत आहे, मात्र ते पुरावे सगळी कहाणी सांगू शकत नाहीत. आजच्या भाषांतील जुने अवशेष आणि त्यांचा एकमेकाशी असणारे संबद्ध यांची वये ठरवण्याची साधने पूर्वी नव्हती... त्यामुळे त्याबाबतीत थियरीच्या पुढे प्रगती नव्हती. जनुकशास्त्राने मानवाच्या प्रवासाची दिशा आणि वेळ नक्की करण्यासाठी जे पुरावे द्यायला सुरूवात केली आहे आणि ते भाषाशात्रातही फार महत्वाचे ठरू लागले आहेत.

याबाबतीत जालिय उत्खनन करताना भाषांच्या आजच्या वापराप्रमाणे काढलेला खालील नकाशा सापडला...

मला वाटते तुमची "भाषांची वये" आणि "लिखीत भाषांच्या सापडलेल्या पुराव्यांची वये" या दोन फार वेगळ्या गोष्टीत गल्लत होतेय.

नाही. भाषांची वये अन लिखित पुराव्यांची वये हे वेगळे असतात हे मला अर्थातच मान्य आहे. पण काही लिंग्विस्ट लोकांच्या म्हणण्याप्रमाणे भाषा बदलाचा वेग तसा जास्त असतो. अन भाषा ५-७ हजार वर्षांनंतर पूर्णपणे वेगळी बनते.

तुमचे बाकीचे विवेचन अर्थातच सुसंगत आहे, पण भाषा रीकन्स्ट्रक्ट करायचे प्रयत्न जे होतात त्यांत एका पॉइंटनंतर खूप मर्यादा येतात, काही अ‍ॅझम्प्शन्स मांडावीत तर कशाचीच धड शाश्वती देता येत नाही. विशेषतः जे "कोअर" असते त्याबद्दल. १० हजार वर्षांनंतरही कोअर कितपत शिल्लक राहते, मला कल्पना नाही. मी याबद्दल फारसे वाचलेले नाही आणि जे थोडेथोडके वाचलेय त्यानुसार फारसे काही शिल्लक राहत नाही. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2013 - 2:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

विशेषतः जे "कोअर" असते त्याबद्दल. १० हजार वर्षांनंतरही कोअर कितपत शिल्लक राहते, मला कल्पना नाही. मी याबद्दल फारसे वाचलेले नाही आणि जे थोडेथोडके वाचलेय त्यानुसार फारसे काही शिल्लक राहत नाही. अगदी खरे !

याकरताच केवळ भाषाशास्त्रिय पुराव्यांवर (शब्द, व्याकरण, वगैरे) अवलंबून न राहता आणि विशेषतः बर्‍याच अपभ्रंशित झालेल्या भाषाशास्त्रिय पुराव्यांना (जे बरेचसे व्यक्तिसापेक्ष असू शकतात) जनुकशास्त्राने सिद्ध केलेल्या वंशावळीचा खात्रीचा पुरावा जोडून त्याचा विश्वासूपणा पडताळून आता अनेक दशहजार वर्षे मागे जाता येते.

जनुके खोटे बोलत नाहीत (म्हणजे त्यांनी दिलेले पुरावे व्यक्तिनिरपेक्ष असतात आणि ते इतर शास्त्रज्ञांना स्वतंत्ररित्या परत पडताळून खात्री करता येण्याजोगे असतात) त्यामुळे ते स्वतंत्रपणे वापरता येतात अथवा इतर सिद्धांतांना विश्वासू मापदंड म्हणूनही वापरता येतात.

याकरताच केवळ भाषाशास्त्रिय पुराव्यांवर (शब्द, व्याकरण, वगैरे) अवलंबून न राहता आणि विशेषतः बर्‍याच अपभ्रंशित झालेल्या भाषाशास्त्रिय पुराव्यांना (जे बरेचसे व्यक्तिसापेक्ष असू शकतात) जनुकशास्त्राने सिद्ध केलेल्या वंशावळीचा खात्रीचा पुरावा जोडून त्याचा विश्वासूपणा पडताळून आता अनेक दशहजार वर्षे मागे जाता येते.

जनुके खोटे बोलत नाहीत (म्हणजे त्यांनी दिलेले पुरावे व्यक्तिनिरपेक्ष असतात आणि ते इतर शास्त्रज्ञांना स्वतंत्ररित्या परत पडताळून खात्री करता येण्याजोगे असतात) त्यामुळे ते स्वतंत्रपणे वापरता येतात अथवा इतर सिद्धांतांना विश्वासू मापदंड म्हणूनही वापरता येतात.

जनुके हे वादातीत पुरावे आहेत याबद्दल दुमत होण्याचे कारणच नाही. पण भाषा आणि ती भाषा बोलणार्‍यांच्या जनुकांचा संबंध लावताना लै केअरफुल राहिले पाहिजे. यासंबंधी काही लिंक्स असतील तर कृपया द्याव्यात, वाचायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2013 - 4:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

पण भाषा आणि ती भाषा बोलणार्‍यांच्या जनुकांचा संबंध लावताना लै केअरफुल राहिले पाहिजे. नक्कीच. हा प्रकार मुख्यतः भाषाशात्राद्वारे केलेले अस्पष्ट दावे तपासून बघायला करतात... उलट्या दिशेने नाही. नक्कीचे दुवे जरा हुडकून मग डकवतो.

आवांतर :

१. Caste bar on marriages became entrenched 2000 years ago, genetic study finds: आजच्या The Times of India च्या जालिय आवृत्तीत आलेली ही बातमी येथे पहा. प्राचीन तारखा नक्की करण्यासाठी जनुकशास्त्र कसे उपयोगी पडते याचा हा एक उत्तम पुरावा आहे.

२. India lost 220 languages in last 50 years, survey finds: ही पण The Times of India त आजच आलेली एक बातमी येथे पहा.

दुव्यांबद्दल धन्यवाद. असे संशोधन नक्कीच उपयोगी पडते. मला आपलं वाटलं तुम्ही ते भाषा आणि "रेस" यांचा संबंध जोडू पाहत होता की कसे. आता ठीके. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2013 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

(अर्थात यांत जनुकीय उत्क्रांतीचा भाषेच्या उत्क्रांतीशी परस्पर संबध लावलेला नाही, फक्त या दोन उत्क्रांतींतिल साम्यस्थळ नोंदवले आहे.) याबाबतचे वरचे ढीस्क्लेमर मूळ प्रतिसादात दिले होते. मात्र ते साम्यस्थळ इतके समान आहे की त्याचा उल्लेख केल्यशिवाय पुढे जाणे ठीक वाटले नाही, इतकेच.

अर्थात, महत्वाचा मुद्दा असा की प्रथम स्थलांतर आणि नंतर राजकीय / आर्थिक / सामाजीक कारणांनी एका भाषेचे दुसरीवर आक्रमण होत होते, होत आहे आणि होत राहील... यातल्या नंतरच्या कारणांचा प्रभाव पडून अनेक भाषा इतक्या बदलल्या आहेत की त्यापुढे जनुकीय सरमिसळ काहीच नाही ! तसेच एक भाषा जरी आक्रमकतेने दुसरीवर प्रभाव पाडत असली तरी दुसर्‍या भाषेचाही आक्रमक भाषेवर कमी पण काहीना काही प्रभाव पडतच असतो. एकंदर हे प्रकरण प्रचंड गुंतागुंतीचे आणि कदाचित् त्यामुळेच प्रचंड आकर्षक आहे ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Aug 2013 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

येणार, येणार, येणार ! इंडोयुरोपियन भाषा आणि रेस यांच्या संबंद्धाचा आणखी सज्जड पुरावा पुढच्या भागात येत आहे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2013 - 5:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

याबाबतीतला हा एक फार महत्वाचा संदर्भ आहे. अजून नंतर टाकेन... हा विषय वाचून बरेच दिवस झालेत.